Saturday, April 3, 2010

किमया

अजब तुझे हे राज्य विधात्या अजब तुझी दुनिया
मर्त्य मानवाच्या शब्दांत वर्णू कशी ही किमया

कसे रुजविलेस बीजाच्या मनी स्वप्न आभाळावर जाण्याचे
कसे शिकविलेस यमुनातीरी, बासाला स्वर गाण्याचे
तहान भागवण्या डोंगरांची, सोडलेस निर्झर का रे     
की अभिषेका ओतलेस मस्तकी दूध त्यांच्या सारे   

सौंदर्य श्रावणी अप्सरांचे जमिनीवर चितारले कुणी 
अंथरले वाटेत त्यांच्या गालिचे जरतारीचे कुणी
उडणारे मखमली रंग नेमके वाऱ्यावर सांडलेस कसे
भुलवाया त्यांसी रान नेटके प्रदर्शनी मांडलेस कसे

भुरभुरणाऱ्या बर्फाचा एवढा हिमालय बनवलास कसा
चिकट मेणाच्या पोळ्यामध्ये मध फुलांचा गाळलास कसा
ढगांच्या मध्यावर इंद्रधनुषी पूल बांधलास कसा  
अधांतरी अंतराळात पृथ्वीचा गोल टांगलास कसा 

वाळूच्या आड दडवल्यास खोल विहिरी तेलाच्या   
सोन्यास दिलीस लकाकी भट्टीत काळ्या कोळशाच्या
कशी केलीस करणी नारळाच्या पोटी गोड पाणी 
अफाट सागरात सांडलीस मात्र मिठाची गोणी

मातीतून घडतसे मूर्ती कुंभाराच्या हातून जशी  
बनवलीस चाकावर कोणत्या दुनिया रे इथे अशी
फिरत असे आसावर गरगर जरी भोवरयापरी   
दिसत नसे का आम्हांस तुझ्या हातातली रेशमी दोरी

अजब तुझे हे राज्य विधात्या अगण्य तुझी ही माया 
शब्दांत सांगण्या सदा जन्म मज इथेच दयावा

Sunday, March 28, 2010

वाद

लिहिण्याचा प्रयत्न करताना प्रासंगिक कविता राहून गेल्याच बरेच दिवस मनाला खटकत होतं.
संवादात्मक वळणाने जाणारी कविता लिहिण्याची मजा वेगळीच आहे कारण त्यात विचारांचा प्रवाह सुरळीत ठेवणं, घटना कल्पित करणं आणि त्यातून दोन्ही पात्रांची बाजू समतोल मांडण कठीण आहे.
छोट्या छोट्या गोष्टीतूनही होणारे वाद,वादातून होणारा संवाद,कल्पना, प्रत्यंतर आणि अखेर त्यातूनच घट्ट होणारी नाती अशी ही गमतीशीर कविता     

[माझ्यासारख्या वक्तशीर माणसाच्या आयुष्यात असले प्रसंग कमीच येतात..LOLz :D
त्यामुळे ही कविता आणि त्यातला संवाद पूर्णतः काल्पनिक आहे, तरीही प्रत्येकाला आपलीच वाटेल मला खात्री आहे]


वाद

"किती उशीर केलास यायला, वेळेचं काही भान आहे का..
हाताची घडी तसूभरही इकडेतिकडे न हलवता

उजव्या पायाची बोटं जमिनीवर आपटतच तिने खडसावलं
आणि मी आणखी किती वेळ थांबावं अशी तुझी इच्छा आहे?"

"जोपर्यंत घडयाळाचे काटे तुझ्या नाजूक मनगटांना टोचत नाहीत
आणि फुगुन लाल झालेल्या गालांतली हवा जाऊन

त्याजागी खळ्यांचे गुलाब जोपर्यंत खुलत नाहीत
बस तेवढा वेळ तर थांबशील ना?" मी घाबरतंच विचारलं

"तू म्हणजे ना, बोलण्यात कधी हार जाणार नाहीस
आज काय नवीन कारण सांगणार आहेस

मी ऐकून घेते म्हणून हल्ली अतीच करायला लागलायंस
दुसरयाचा विचार करायला कधी शिकणार देव जाणे"

मी म्हटलं, "हा प्रश्न आपला तू तुझ्या देवालाच विचार
दिवसेंदिवस स्वतःचा कमी आणि तुझाच सारखा विचार करतो,

बोलण्यात फक्त हरायचं बाकी राह्यलय आता
बाकी श्वासांसासकट सगळं हरवून बसलोच आहे मी"

"एखाद दिवशी मी अशी उशीरा आले तर काय करशील"
"काय करणार...वाट बघत बसेन अशीच कोपरावर हनुवटी टेकवून"

पण थातूरमातूर उत्तराने समाधान कसं होईल तर कसलं
लगेच तिने विचारलं कशी..चातकासारखी का चकोरासारखी?

"चकोरासारखा काल्पनिक असतो, चातकासारखे पंख असते
तर आलो नसतो का क्षणार्धात उडत तुझ्यापाशी
   
खरंतर..नुसतं पिस असतो तरी चाललं असतं
वाऱ्यावर तरंगत येऊन तुझ्या कुशीत विसावलो असतो"

हे ऐकून तिची कळी जरा खुलली, पण इतक्या सहज ऐकेल तर ती कसली
तिचं उत्तर तयारच होतं, "म्हणे उडणारा रंगीत पक्षी,

मग चांगला पिंजऱ्यात डांबला असता तुला मी
म्हणजे नेहमी माझ्या डोळ्यासमोर राहिला असतास"

मी म्हटलं, "तुझ्या नजरकैदेतलं जिणं मला मंजूर आहे
आभाळाची साथ सोडणं मला कबूल आहे, बस एक छोटीशी अट आहे

जादुगारीणीचा जीव जसा पक्ष्यात असतो तसा
तुझा जीव जर माझ्यात राहणार असेल तरंच"

मग ती वरमली, अरे वेड्या, काय एवढं मनाला लावून घेतोस सारं
आणि तुला कोंडून ठेवणं म्हणजे स्वत:लाच कोंडण नाही का

पिंजरयाचं दार उघडं ठेवलं तरी निसटणार नाहीस खात्री आहे
जीव सदैव तुझ्यातच आहे म्हणूनच तर करमत नाहीना

मी म्हटलं "चला, तेवढंच आम्हाला समाधान लाभलं  
अख्खी संध्याकाळ भांडणात जाउनही सारं शेवटी सुरळीत झालं"

वाद आज झाले, उद्याही होतील, नुसत्याच गोडीत गंमत काय
समोर फक्त तू असलीस की बास, जन्माला अजून पुरलंय काय 
  

Saturday, March 27, 2010

कवितेची सुरुवात

कधी माणसांच्या गराड्यात, उगाच एकटं एकटं वाटतं
तर कधी चाकोरीचे रस्ते धरून, गर्दीबरोबर ढकललं जावसं वाटतं
लाटेबरोबर असहाय वाहत जातं विचारांचं गलबत जेव्हा

कवितेला...तिथेच सुरुवात होते

कधी पोटातली चीड आतल्या आत पोखरत राहते,
सहन करत राहण्याची आपलीच जुनी सवय मोडाविशी वाटते
संतापाची ठिणगी चरफडत एकेदिवशी, बंद मुठीतून बाहेर पडते ना

कवितेला...तिथेच सुरुवात होते

कधी लाखवेळा डोकं टेकवूनही लीन झाल्यासारखं वाटत नाही
मूर्तीपुढे तासंतास उभं राहूनही वाटतं, आपलं गाऱ्हाणं त्याच्यापर्यंत पोचत नाही
दगडातल्या दिव्यत्वाची शंका येऊ लागते ना

कवितेला...तिथेच सुरुवात होते

गर्दीतला कोण्या 'ति' चा चेहरा एक दिवस नजर खिळवून धरतो,
बहुदा आकाशातल्या प्रकाशकाचीच आज्ञा असते तशी
मग जेव्हा कानात शेकडो व्हायोलिन्स वाजू लागतात आणि सुरांचे थेंब बरसू लागतात

कवितेला...तिथेच सुरुवात होते

मग ना छंदाच भान उरतं ना लयीचं, कोणीतरी हात धरून लेखणीला नाचवत राहतं
वाऱ्याबरोबर सांडलेली फुलं आपोआपच हारांत ओवली जावीत, अक्षरंही तशीच नकळत गुंफली जातात
हळव्या ओठांना मौनाचं भाषांतर अवघड वाटतं जेव्हा

कवितेला...तिथेच सुरुवात होते

कवी आणि कवितेचं नातंच जरा विचित्र असतं, कागदावर समोर असलं तरी मनात तितकंच अव्यक्त असतं
त्याला खूप काही सांगायचं असतं पण सगळंच लिहीता येत नाही
आणि तिला सतत बोलूनही मोकळं झाल्यागत वाटत नाही

तरीही त्यांना एकमेकांची, साथ पुन्हा हवीशी वाटते जेव्हा

कवितेला...तिथेच सुरुवात होते

Sunday, March 21, 2010

जिंदगी

एवढंच विचारतो मित्रा, जरा सांगशील का रे

आयुष्य खूप जगलास, जिंदगी जगलास का रे ? 



सुट्टीतही पाच वाजता न चुकता उठलास

बारा वाजेपर्यंत बिछान्यात लोळलास का कधी ?

जिमखान्यात गेलास,हॉबी क्लासलासुद्धा गेलास

काटलेल्या पतंगाच्या मागे धावलास का कधी ?


चेस आणि बिझनेस मध्ये नेहमीच जिंकत आलास

गोट्या खेळताना खड्ड्यात चकुन राजा झालास का कधी ?

मोठा होताना तुझा बालपण हरवलस का रे

आयुष्य खूप जगलास, जिंदगी जगलास का रे ?




पुस्तकांच्या ढिगाऱ्यात आयुष्यभर रमलास

युनिफोर्मच्या घडीसारखा टापटीप राहिलास

शार्प केलेल्या पेन्सिलींची फुलपाखर केलीस का कधी ?

इंग्लिशची नवीन मिस तुला आवडली नाही का रे कधी ?

पहिल्या बाकावर बसून सगळं लेक्चर नीट ऐकलंस

वहीमध्ये नोटस काढून पेपरातही तसच छापलस

बाकाखाली लपून चोरून डबा खाल्लास का कधी

खिडकीबाहेर डोकावून माकडवाल्याचा खेळ पाहिलास का कधी ?

शाळेत फळ्यावर नाव लावलस,पण बाकावर कोरलस का रे ?

आयुष्य खूप जगलास, जिंदगी जगलास का रे ?



टायची नॉट सांभाळत "व्हाईट कॉलर " राहिलास

हेल्थ आणि हायजीन जपत घरातच बसलास

होळीच्या गुलालात चिंब रंगलास का कधी

वळवाचा पाउस धो धो अंगावर घेतलास का कधी

विटामिनच्या गोळ्या आणि सिरप पिऊन वाढलास

पाणीपुरीचा ठसका चाखलास का कधी

फिटनेससाठी काय काय नाही केलंस

पण पंगतीत गुलाबजाम ओरपलेस का कधी

झोपेच्या गोळ्या घेण्यापेक्षा चांदण्या का नाही मोजल्यास रे

आयुष्य खूप जगलास, जिंदगी का नाही जगलास रे ?



फ्रेंडलिस्ट आणि ग्रुप्स वर पुष्कळ मित्र जमवलेस

कोपऱ्यावरच्या टपरीवर चायसुट्टा केलास का कधी ?

सीसीडी आणि Inox च्या multiplex माहोलात हिंडलास

गर्लफ्रेंड बरोबर पावसात खंडाळ्याला भिजलास का कधी ?

आवाज न येणाऱ्या, AC गाडीत खुपदा फिरला असशील,

बिझनेस क्लास मधून हवेतही उडला असशील,

पण जागेवर रुमाल टाकून, खिडकीतून एसटीत चढलास का कधी

तीन माणसांच्या सीटवर, पाचवा बसलास का कधी

टाइम्सच्या column मध्ये articles चिकार लिहिलीस

आठवणीत बेचैन होऊन कोणाच्या चार ओळी लिहिल्यास का रे ?

यशाच्या पायरया चढण्यात तारुण्य विसरलास का रे

आयुष्य तर खूप जगलास, जिंदगी जगलास का रे ?



वेळ गेली नाही अजून,बंधने सगळी तोडून दे

माझं ऐकशील तर पहिलं "नको" म्हणणं सोडून दे

उद्याच कोणी सांगितलंय, आज दुनिया बघून घे

आयुष्य खूप जगलास आजवर, आता जिंदगी जगून घे!!!

आभास

तुला पाहिलंय तिथं मी..

नभ धुंद झालेलं, मन कुंद भरून आलेलं
खळं लोभस लाजेचं, तुझ्या गाली विखुरलेलं

श्वासात भरून घेतलाय, रातराणीचा गंध
साठवून ठेवलाय तो शहारून गेलेला आसमंत

तुला पाहिलंय तिथं मी..

अंधारल्या गर्तेत बुडलेले, तारकांचे पुंज जसे
तुझ्या नयनीचे डोह, तितकेच अथांग,

पाण्यावर सांडलेला तो चंद्र, भरलाय या ओंजळीत
चांदण्याचे थेंब अलगद, झेललेत तळहातांवर

तुला पाहिलंय तिथं मी..

निळ्या तारकांच्या देशी, कोऱ्या ढगांचे गालिचे
नक्षत्रांचे नकाशे, अस्फुट होती जिथे

काळ्या पाटीवर उमटती, अशनींच्या रेखा
तुझ्या नावाची अक्षरे, कोरून ठेवलीयत मी

तुला पाहिलंय तिथं मी..

सकाळ होण्याआधी, रोज पहाटेच्या झोपेत
ते स्वप्न, तो आभास कधी संपूच नये वाटणारा

घड्याळाकडे मागून घेतलीय अजून थोडी वेळ
आणि पापण्यांची चादर पुन्हा ओढून घेतलीय

तुला पाहिलंय तिथं मी..

Wednesday, January 6, 2010

अल्पविराम


प्रेम वगैरे खरंच काही नकोय गं,
कसा आहेस...विचारलंस, यातच सारं आलं

हवीय कोणाला ती आयुष्याभराची सोबत,  
दोन शब्द जरा बोललो तरी मोकळं वाटेल बघ
कशाला जोडावी उगाचच जन्मोजन्मीची नाती,
आज हातात हात आहे, उद्याही राहीला तर बरं

प्रेम वगैरे खरंच काही नकोय गं,
मला तुझ्याकडे खेचायला गुरुत्वाकर्षण आहेच की
मग हवीय कशाला ती नजरेची ओढाताण
तू तुझ्या बागेतल्या फुलांवर विहरत रहा मनमुक्त
माझ्याकडच्या पतंगांना झेपावायाला वातीच तप्त आकाश आहे पुरेसं

प्रेम वगैरे खरंच काही नकोय गं,
आज भेटतोय कैक वर्षांनी भेटल्यासारखे, गप्पात हरवून जाऊ पुन्हा
उद्या आठवण राहिली तरी खूप आहे आणि तीही नाही उरली तरीही
कुठेतरी निळ्या पार्श्वभूमीवरचे आपले कोरे चौकोनी चेहरे
सदैव हसतीलच ना एकमेकांकडे बघून

प्रेम वगैरे खरंच काही नकोय गं,
मनात आलं ते तुला सांगण्याच स्वातंत्र्य आहे ते काय कमी आहे
तसे आजही आहेतच की नलराजाचे आधुनिक हंस Archives मध्ये बंदिस्त व्हायला
गालावरचं गोड हसू फक्त राहुदे तसंच निखळ
कारण अजून 'स्माईल कॅप्चर' कॅमेर्याचं तंत्रज्ञान तितकसं अद्ययावत नाही झालंय खरं
......

प्रेम वगैरे खरंच काही नकोय गं,
आजही निरोप घेतल्यावर पुन्हा मागे वळून पाहिलस
ना..त्यातच सारं आलं

बेकार


आता सारे बेकार होणार  
डोळे विस्फारून कोणाला शोधणार
का आपल्याच पावसात भिजत झुरणार
रात्र रात्र जागून कोणासाठी काढणार
का दिवस दिवस देखावे शून्यतेचे बघणार
आता सारे बेकार होणार

कानांशी खुसपूस कोण करणार
सारा संवाद कसा स्वगतच होणार  
दोघे आता एकमेकांशीच बोलणार
एक ऐकणार आणि दुसरा सोडून देणार
आता सारे बेकार होणार

तोंडाच्या तोंडच पाणीच पळणार 
दात आतल्या आत दांतओठ खाणार
सुकलेल्या टाळूवरून फिरत जीभ
मौनाचे बेचव मूग गिळत राहणार
आता सारे बेकार होणार

पोटातले खड्डे आपोआप बुजून जाणार
उरातले धपापते भाते उगाच जड होणार
मनाच्या रिकाम्या बोगद्यातून मात्र
श्वासांचे आवाज कर्कश्श घुमत राहणार  
आता सारे बेकार होणार

हातांना लेखणीचेही ओझे नकोसे 
स्पर्शाचा तर जन्मच अस्पृश्य होणार
मान खाली मान घालून   
मुकाट सारे सोसत राहणार
आता सारे बेकार होणार

आंधळी पावलं एकटीच फिरणार   
आठवणीच्या काठीचा आधार घेत घेत  
अनोळखी वाटेने, तुझी चाहूल शोधत पुन्हा   

ओळखीच्या खुणा चाचपडत निघणार..